![]()
बल्लारपूर / चंद्रपूर जिल्हा (महाराष्ट्र):१९ ऑग २५: आम आदमी पार्टी, बल्लारपूरने आज बुद्धनगर प्रभागातील प्रशासनाच्या गंभीर चुकीवर प्रकाश टाकला आहे. नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून BN 9 क्रमांकाची बोअरवेल खोदली, परंतु प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे ही बोअरवेल आता जनतेसाठी धोकादायक बनली आहे.
![]()
बोअरवेलच्या अगदी बाजूला, सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून, चुकीच्या पद्धतीने भूमिगत वायरिंगचा फीडर पिलर, विजेचा खांब आणि अर्थिंग बसवण्यात आले आहे. यामुळे केवळ सार्वजनिक निधीचा गैरवापर झाला नाही, तर नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या चुकीच्या नियोजनामुळे, बोअरवेल असूनही बुद्धनगर प्रभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. हा जनतेच्या पैशांचा आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा घोर अपमान आहे. या गंभीर समस्येबद्दल आम आदमी पार्टीने यापूर्वीही नगरपरिषदेला तोंडी माहिती दिली होती, परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आम आदमी पार्टीने आता लेखी मागणी केली आहे: येत्या पाच दिवसांत बोअरवेलच्या जागेवरून फीडर पिलर, अर्थिंग, वायरिंग आणि खांब त्वरित हटवून बोअरवेल नागरिकांसाठी खुली करण्यात यावी. या चुकीच्या आणि धोकादायक कामासाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी यासंदर्भात प्रशासनाकडून लेखी माहितीची मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, आम आदमी पार्टी जनतेला सोबत घेऊन तीव्र भूमिका घेणार, असा इशाराही आसिफ शेख यांनी दिला. जनतेच्या पैशांचा असा गैरवापर आणि त्यांच्या सुरक्षिततेशी होणारा खेळ कधीही खपवून घेणार नाही, असे पुप्पलवार यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार यांच्यासह प्रवक्ते आसिफ शेख, महिला अध्यक्षा किरण खन्ना, शर्मन बंसेल, स्नेहा गौर, हर्षद खंडागडे, सम्यक गायकवाड, आदित्य भागवत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


