![]()
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) क्षेत्रात आगामी काळात मोठे औद्योगिक प्रकल्प येत असून, त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.
भद्रावती परिसरात ‘न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ग्रेटा एनर्जी’ हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. हे प्रकल्प कोळसा गॅसीफिकेशन आणि कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानावर आधारित असून, स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक असलेले रस्ते, रोड ओव्हर ब्रिज आणि सक्षम जलवाहिन्यांची सध्या या MIDC क्षेत्रात मोठी कमतरता आहे. या तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पांच्या प्रगतीत अडथळे येत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या दोन्ही मोठ्या प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून, संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, केंद्र सरकारच्या ‘क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ मधून या कामांसाठी तातडीने आर्थिक तरतूद करावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


